संसार खरंच इतका अवघड आहे का?
माणसाला नेमकं काय हवंय?
संपूर्ण आयुष्य संगीतमय करता येणार नाही का?
एखाद्या मैफिलीसारखं रंगवता येणार नाही का?
आपल्या जन्मापूर्वी हे जग होतंच. आपण मेल्यानंतरही जगाचा कारभार हा असाच चालू राहणार आहे. ह्या अवाढव्य रंगमंचावर आपली 'एंट्री' मध्येच केव्हातरी होते आणि 'एक्झिट'ही.
हे नाटक किती वर्षांचं, ते माहित नाही. चाळीशी, पन्नाशी, साठी, सत्तरी .... सगळं अज्ञात. घडधाकट भूमिका मिळणार, की जन्मांधळेपणा, अपंगत्व;
बुद्धीचं वरदान लाभणार की मतिमंद?
भूमिकाही माहित नाही.
तरी माणसाचा गर्व, दंभ, लालसा ... किती सांगावं?
कृष्णानं बासरीसहित आपल्याला पाठवलं;
पण ह्या सहा छिद्रांतून संगीत बाहेर येत नाही.
षड्रिपूंचेच अवतार प्रकट होतात.
स्वत:ला काही कमी नाही. स्वास्थ्याला धक्का लागलेला नाही.
तरी माणसं संसार समजू शकत नाहीत.
"आपण सारे अर्जुनच."
No comments:
Post a Comment